मुदाई मंदिर २५० ते ३०० वर्ष जुनं आहे. ते वर्षातले ८ ते १० महिने पाण्यामध्येच असते फक्त काही काळ उन्हाळ्यात ते पाण्याच्या बाहेर असते. त्याच वेळी भाविक या मंदिरात दर्शन घेऊ शकतात. मंदिर पुरातन असून त्याचा पुरावा देऊ शकत नाही पण त्याच्या एकूणच बांधकामाच्या शैली वरून मंदिर २५० ते ३०० वर्ष जुनं असावे असे लक्षात येते.

मंदिराच्या घुमटाचे बांधकाम चुन्यामध्ये केलेले आहे. पूर्वीच्या बांधकामामध्ये स्लॅब तयार करणे असा काही प्रकार नव्हता, जसे आपण मडकं घडवतो, प्रथम हळू हळू मडक्याचा वर्तुळाकार आकार बनतो व नंतर मडक्याचा वरचा डेरा घडवतो तसा हळू हळू मंदिराचा गोलाकार घुमट तयार केला गेला असावा आणि नंतर त्यावर शिखर चढवलं गेले असावे.

तसेच मंदिराच्या बांधकामामध्ये वापरलेल्या विटा आत्ताच्या जशा ४ * ६ असता तशा नाहीत त्या चपट्या साधारण दीड किंवा दोन इंच रुंदी आणि चार ते पाच इंच लांबी अश्या असाव्यात. पाण्याच्या हपक्य ( पाण्याचा मारा ) मुळे विटेला आधार देणारा चुना निघत चाललेला आहे. त्या विटांमधील चिरा सिमेंटने भरण्याचा प्रयत्न आत्ताच्या पिढीने केला आहे पण जी मंदिराची जी जुनी रचना आहे तिला धक्का नाही लावला. या सुधारणेमध्ये सिमेंटचा वापर करून विटांमधील चिरा भरणे आणि छताचे झालेले नुकसान यांचा समावेश आहे.

तांदळा म्हणजे पूर्वीच्या काळी वीणेच्या आकाराचा दगड उभा करून त्याची प्राणप्रतिष्ठा केली जायची. देवीची मूर्ती हि याच तांदळा प्रकारची आहे. याच तांदळाच्या मूर्तीला जवळ जवळ २५० वर्ष झाले असतील तरीही तो आज चांगल्या स्थितीत उभी आहे. या तांदळाच्या मूर्तीने आत्ता पर्यंत जवळ जवळ २५० वर्ष नीरा नदीच्या पाण्याचा मारा सहन केला आहे.

मंदिराला सभामंडप ही होता हे आत्ताच समजले, ते यावरून की मंदिराच्या समोरील बाजूस स्टीलचा म्हणजेच लोखंडी गजांच्या वापर केल्याचे पुरावे दिसून आलेत, अगदी अलीकडच्या काळात स्टीलचा वापर करून सभामंडप बांधण्यात आला असावा असे वाटते पण तोही आत्ता पडून गेलेला आहे. मंदिरासमोर एक दिपमाळ आहे, तिच्या रचनेवरून ती ही मंदिरा इतकीच जुनी वाटते.

बरोबर मंदिराच्या खालच्या बाजूला नदी वाहते, तिथे बांधीव घाट होता जसा कृष्णेला आहे तसा. असा उल्लेख पूर्वीची माणसे करत होती. पूर्वी नीरा नदीचे पात्र छोटं होत त्यामुळे तो घाट पूर्णपणे दिसायचा पण आत्ता पात्र इतकं मोठा झालं की कमीत कमी त्यावर १५ ते २० फूट गाळ साचला असेल. तो घाट शोधला तर सापडू शकतो. पण तो अचूक कोणत्या जागी आहे ते माहित नसल्यामुळे ते खूप अवघड आणि खर्चाचे होऊ शकते.

पूर्वी असे बोलले जायचे की मुदाईच्या जत्रे आधी एक दोन दिवस जत्रेला लागणाऱ्या वस्तू नदीतून वरती येत असत आणि जत्रा झाल्यानंतर त्या तश्याच पाण्यात सोडून दिल्या जायच्या आणि दुसऱ्या दिवशी त्या गायब होत असत. शेवटी एका माणसाने त्या वस्तूपैकी एक वस्तू चोरली त्याचा उद्देश काय होता हे माहित नाही पण त्या दिवसापासून त्या वस्तू प्रकट होणे बंद झाले. आज तागायत आम्ही असे काही पाहिले नाही पण कोणाला माहित खरे आहे की गैरसमज.

पुरातन मुदाई देवी मंदिर वर्षातले ८ ते १० महिने पाण्यामध्येच असल्यामुळे भाविकांच्या सोयी साठी नवीन मंदिर बांधायचे काम चालू आहे ते जवळ जवळ संपतच आले आहे. हे मंदिर पूर्णपणे भोई समाजाचे तारू कुटुंबच बांधत आहेत. मंदिराच्या पायाभरणीमध्ये सर्व तरू कुटुंबीयांनी आर्थिक मदत केली आहे.

मुदाई देवी हे तारू कुटुंबाचे कुलदैवत आहे. तारू म्हणजे पालखीचे भोई. तारू हे नाव कसे मिळाले याचाही इतिहास आहे. जेव्हा शिवाजी महाराजांच्या मागे गनीम म्हणजे शत्रू लागले तेव्हा शिवाजी महाराजांना नदीच्या पलीकडे सुखरूप पोहचवणे गरजेचे होते. भोई हे पालखी वाहणारे असा उल्लेख पुराणांमध्ये आणि इतिहासात सर्वत्र आढळतो. तर भोई पथकांपैकी चार भोई शिवाजींना महाराजांना पोहत पोहत नदी पार करतील आणि बाकी गनीमांना थोपवून धरतील अशी योजना होती. शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून काही मावळ्यांसोबत नदी पार केली. पाठीमागे जे राहिले होते ते गनिमांच्या तावडीत सापडले आणि त्यांनी त्यांचे शीर उडवून टाकली. तेव्हा महाराजांनी सांगीतले की त्यांचे जे वंशज आहेत त्यांचं आडनाव शिर्के होईल आणि ज्यांनी आम्हाला तारून न्हेलं आहे त्यांचं आडनाव तारू राहील हा इतिहास श्री बाबासाहेब पुरंदरे यांनी श्री नंदकुमार तारू यांना शिरवळ मध्ये असताना सांगितला.

फोटो संग्रह

Mandai Mata Mandir Shirwal

        नीरा नदीचा दक्षिणोत्तर वाहणाऱ्या मंडा ओढयाच्या काठावर श्रीमंडाईदेवीचे मंदिर आहे. मंडा ओढयाच्या बाजूला पूर्वेला एक छोटा दरवाजा आहे. बहुधा तो मंदिराच्या प्राकाराचा भाग असावा. त्याच्या आजूबाजूला तटबंदीचे पडके अवशेष दिसतात. मंदिराचा प्राकार फार मोठा नाही. मंदिर दक्षिणभिमुख आहे. दक्षिणेला असलेल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पायऱ्या उतरून आपण छोट्या प्राकारात येतो. लगोलग उजव्या हाताला एक छोटी पाण्याची बावर आहे. बावर पक्की बांधलेली आहे. त्यात उतरायला पायऱ्या आहेत. बांधकाम जागोजागी ढासळलेले आहे. कधी काळी या बारवेच्या पाण्याचा उपयोग देवीच्या नित्य पूजेसाठी होत असावा. पायऱ्या उतरताच डाव्या हाताला देवीच्या सन्मुख श्रीगणेश मंदिर आहे. या उत्तराभिमुख गणपतीची मूर्ति ओबडधोबड आहे.

       मंदिराच्या वर बांधलेले छत अगदीच अलिकडचे वाटते. या प्रकारातच गणपतीच्या डाव्या बाजूला आणि देवीच्या उजव्या बाजूला महादेवाचे अगदी मोडकळीला आलेले पूर्वाभिमूख मंदिर आहे. याचे नाव श्रीमंडेश्वर. सभामंडप आणि गाभाऱ्याचे बांधकाम मजबूत आणि जवळ जवळ सारखेच आहे. गाभारा साभामंडपापेक्षा थोडा खालच्या आहे. सध्य मंदिराचे नवे बांधकाम करण्याचे चालू आहे जवळ जवळ ५०% काम पूर्ण झाले आहे.

फोटो संग्रह

Source:-

  • Information Source: Subhanmangal Book
  • Note: Following information totally refer from Subhanmangal Book all credit goes to book writer
Sant Dnyaneshwar Maharaj Mandir

शिरवळ गावचे प्रसिद्ध व्यापारी कै. श्री. शिवराम सिताराम डोईफोडे यांची संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर असलेली श्रद्धा सर्वश्रुत आहे. हयातीत त्यांनी प्रत्येक महिन्याच्या एकादशी दिवशी ते आळंदीला दर्शनासाठी जात असत. परंतु जसजसे त्यांचे वय वाढले तसे त्यांना आळंदीला जाने येणे कठीण होऊ लागले. तेव्हा त्यांच्या स्वकमाईतून श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर बांधण्याचे ठरविले आणि दि. ९/५/१९९७ रोजी त्यांनी सदर मंदिर बांधून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संगमरवरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ह.भ.प सदानंद महाराज आळंदीकर यांच्या हस्ते करूंन त्यांची इच्छा पूर्ण केली. आणि त्यांच्या हयातीत त्यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिरात अर्पण केले. आज त्यांच्या पश्चात त्यांची सुनबाई सौ. रत्नप्रभा रोहिदास डोईफोडे या पूर्णपणे या मंदिराचे स्वच्छता राखणे, दैनंदिन पूजा करणे इत्यादी कामे मनापासून करतात. शिवाय दर गुरुवारी या मंदिरामध्ये शिरवळ चे भजनी मंडळ भजन करीत असतात.

Source:- Lailesh Doiphode

ambabai shirwal

श्री अंबाबाई ही शिरवळची ग्रामदेवता आहे. शिरवळच्या ग्रामस्थांचे एक मोठे श्रद्धास्थान म्हणजे अंबाबाईचे. यालाच अंबाई असेहि म्हणतात. अनेकांचे ते कुलदैवत आहे. हि देवी नवसाला पावते व मोठी जागृत आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रात तुळजापूरच्या अंबाबाईला काठी नेण्याचा प्रघात फार जुना आहे. काठी हे देवतेचे प्रतिक. ही सजविलेली  काठी सुमारे वीस फूट उंच आणि ध्वजाने अलंकृत केलेली असते. या काठीवर नानाप्रकारची आभूषणे घालण्याची प्रथा आहे. ही काठी खांदयावर घेऊन चालत आलेल्या प्रथेनुसार ठराविक ठिकाणी मुक्काम होतो. या कोठीचे मानकरी ठरलेले आहेत.

दरवर्षी अक्षय तृतियेला देवीचा महोत्सव असतो आणि गावयात्रा हि असते. सारे गावकरी हा महोत्सव अत्यंत थाटामाटात साजरा करीत असतात. आज शेटे घराण्याकडेच या मंदिराची व्यवस्था आहे.

श्रीअंबाबाईची मूर्ति सायुध आहे. ती महिषासुरमर्दिनी आहे. साध्या काळ्या पाषाणाचीच असली तरी ती रेखीव व सुबक आहे. शिरवळकर तर या देवीचे भक्त आहेतच परंतु बाहेरगावीही अनेक भक्त आहेत आणि ते आठवणीने, श्रद्धेने देवीच्या उत्सवाच्या वेळी शिरवळला येऊन कुलाचाराप्रमाणे पूजाअचा नेवैध्य अर्पण करतात. चैत्र महिन्यात रामनवमीपासून या देवीचा  उत्सव चालू होतो तो वैशाख शुद्ध पौर्णिमेपर्यंत चालतो. रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी देवीची मानाची काठी तुळजापूरला जाण्यासाठी मानकऱ्यांसह बाहेर पडते. प्रथेप्रमाणे तिचे प्रस्थान ठेवले जाते. मानकरी मग ही काठी बाजारपेठेत आणतात. मजल दरमजल  करीत या काठीला तुळजापूरला जायचे असल्याने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणेच भाविकजन बरोबर असतात. काठी रात्रभर ग्रामस्थांच्या दर्शनार्थ बाजारपेठेत राहते आणि सकाळी श्रीमंडाई देवीच्या मार्गाने तुळजापूरला जाण्यासाठी परंपरेनुसार निघते. काठीचा जाण्यायेण्याचा आणि मुक्कामाचा क्रम ठरला आहे. त्यांत बदल होत नाही.

फोटो संग्रह

Source:-

  • vicharmanthan shirwal-pride facebook page
  • Information Source: Subhanmangal Book
  • Note: Following information totally refer from Subhanmangal Book all credit goes to book writer
rameshwar

       श्रीरामेश्वराचे मंदिर गावाच्या पश्चिमेला नीरा नदीच्या काठावर आहे. हा भाग वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातलाच आहे. मंदिर नदीच्या पात्रापासून जरा दूर व उंच जागेवर असल्याने पाण्यात बुडत नाही इतकेच . त्याच्या समोरच थोड्या अंतरावर जवळ जवळ नदीच्या पात्रात गर्गेश्वराचें मंदिर आहे. पण आता ते पाण्यात बुडालेले आहे.

       रामेश्वराचे मंदिर हेमाडपंती आणि कमानी असलेले मोठे टुमदार आहे. आजूबाजूला बागबगीचा केला आहे. पाणी नसेल तेव्हा मोकळ्या हवेत फिरण्यासाठी अगदी उत्तम असे हे स्थान आहे. रामेश्वराच्या देवळापासून निरेचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. पावसाळ्यात पात्रात पाणी अमाप असते आणि सारा प्रदेश एखाद्या प्रचंड खाडीसारखा दिसतो. रामेश्वरापासून सूर्योदय अतिशय छान दिसतो. पूर्वेला शुभानमंगळचे अवशेष दिसतात जवळच गावाचे स्मशान भूमी आहे.

फोटो संग्रह

Source:-

  • Image vicharmanthan shirwal-pride facebook page, Ravindra Salunkhe Google map
  • More help- Sanjay Khairnar
  • Note: Following information totally refer from Subhanmangal Book all credit goes to book writer
Bhairavnath Mandir Shirwal

शिरवळचे भैरवनाथाचे मंदिर गावाच्या पूर्वेला आहे. या मंदिराला जाताना वाटेत उजव्या हाताला निगडे देशमुखांचा ऐतिहासिक वाडा आहे. भैरवनाथाच्या मंदिराचे पश्चिमाभिमुख महाद्वार लागते. ते चांगलेच उंच आणि भव्य आहे. या महाद्वाराच्या कमानीची एक वेगळीच धाटणी आहे. या मंदिराभोवती दगडी तट आहे. या दारातून गेल्यावर काही पायऱ्या उतरून आपण प्रकारांत येतो. एक विशेष बाब म्हणजे या भैरवनाथाचे तोंड दक्षिणेला आहे. चारी बाजूनी दगडी तट आणि उत्तरेच्या अंगाला मुख्य मंदिर आहे. मंदिर बरेच जुने, यादवकालीन असावे. सभामंडप, अंतराळ आणि नंतर देवाचा गाभारा असा सर्वसाधारण क्रम असतो. इथे तसा तो बघायला भेटत नाही. पडवीवजा जागेतून एकदम देवापाशी जाता येते. प्राकारात कधीकाळी सोपेवजा इमारती असाव्यात असे तेथील अवशेषांवरून वाटते.

भैरवनाथ म्हणजे कालभैरव. याला गावाचा रक्षण करता म्हणून आळखले जाते. साधारण चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून गावामध्ये उत्सव सुरु होतो. त्यांना यात्रा असेही म्हणतात. यात्रेच्या ठिकाणी मुख्य देवतेचे दर्शन घेतल्यावर कालभैरवाचे दर्शन घायचे असते अशी प्रथा आहे. याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही.हि प्रथा गावामध्ये फार पूर्वीपासून चालत आलेली आहे.

या दिवसात कुस्त्यांचे फड, तमाशे, देवाचा छबिना इत्यादी गोष्टी साजऱ्या होतात. शिवाय मराठी शाळेच्या मैदानामध्ये विविध प्रकारचे पाळणे लागतात. यात्रे मध्ये लहान मुलांना हे मुख्य आकर्षण असते. या यात्रेसाठी बाहेर गावातील पाहुण्याना बोलावले जाते.

फोटो संग्रह

Source:-

  • vicharmanthan shirwal-pride facebook page
  • Note: Following information totally refer from Subhanmangal Book all credit goes to book writer
Kedareshwar

श्रीकेदारेश्वराचें भव्य आणि सुंदर मंदिर शिरवळ गावाच्या पश्चिमेला एका ओढ्याच्या काठावर आहे. हे मंदिर प्रशस्त आणि उत्तम घडीव दगडी कोट (तट) आहे. ताटाची उंची सुमारे अठरा फूट आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून महाद्वाराचे बांधकाम रेखीव ,सुबक आणि मजबूत आहे. प्रवेशद्वाराचे कमान सात पाकळ्यांची,थोडी उभट ,उंच आहे. ती दोन सुबक स्तंभावर आधारलेली आणि अगदी प्रमाणबद्ध आहे. देवळात प्रवेश केला कि दोन्ही बाजूंना देवड्या आहेत. या देवड्यांवर पूर्वी नगारखाना असावा. एका वृद्ध गृहस्थाने सांगितले कि “इथे नगारा वाजला कि तोफ वीरगावापर्यंत ऐकायला जात असे. वीरगाव तस बरेच लांब आहे. या नगारखान्याच्या खाली आणि प्रवेशद्वाराच्या आणि देवडीच्या वर देवासन्मुख एक श्री गजाननाचे शिल्प आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना ऋद्धी सिद्धी असून ते भग्नावस्थेत आहे. गणपतीचे असे महाद्वारात व देवसन्मुख शिल्प महाराष्ट्रात अन्यत्र कुठे दिसत नाही.

महाद्वाराच्या आत प्राकारात सुरवातीलाच देवाकडे तोंड करून नंदी एका उंच चौथऱ्यावर बांधलेल्या छोटेखानी मंदिरात बसलेला आहे. त्याला नंदिकेश्वर असे संबोधलेले आहे. नंदीच्या चारही बाजुंनी कमानी असून वर उंच घुमट आहे.नंदीच्या उजव्या हाताला दक्षिण कोपऱ्यात सुबक अशी दीपमाळ आहे. हि दीपमाळ अष्टकोनी घडीव दगडांची आहे. पण दीपमाळसमोर प्राकारात दोन छोटी गणपती आणि विठ्ठलाची देवळे आहेत. नंदिकेश्वराच्या समोरच्या उंच चौथऱ्यावर श्रीकेदारेश्वराचे मुख्य मंदिर आहे.

पहिला सभामंडप एकूण सोळा दगडी खांबावर उभारलेला आहे. या सभामंडपावर पूर्वी दोनदा वीज पडली आणि त्यामुळे बरेच नुकसान झाले. हे जुने बांधकाम मुळातच मजबूत असल्याने विजेचे दोन तडाखे त्याने सहन केले. या सभामंडपानंतर एका नेटक्या प्रवेशद्वाराने आपण मधल्या गाभाऱ्यात प्रवेश करतो. सुमारे ४० फूट लांब आणि ३० फूट रुंदीचा हा गाभारा पाच पाच खांबाच्या ओळींवर उभा आहे देवाच्या गाभाऱ्याचे प्रवेशद्वार येथेच आहे. डोक्यावर गणेशपट्टी आहे. देवाचा गाभारा खाली खोल आहे. श्रीमुख पूर्वेला आणि सोमसुत्र उत्तरेला आहे. देवळाच्या शिखराची जमिनीपासून उंची सुमारे ४५-५० फूट असावी.

शिखरावर नाना प्रकारच्या देवदेवतांच्या मूर्ती असून त्या आजही सुस्थितीत आहेत प्राकाराच्या आतून मंदिराला प्रदक्षिणा घातली तर प्रकाराचा विस्तार जास्त लक्षात येतो.केदारेश्वरासमोर जी पुष्करणी आहे ती इतिहासात “केदारबाव” या नावाने प्रसिद्ध आहे. ती चांगल्या घडीव दगडांनी बांधलेली आहे. पाण्यापर्यंत जाण्यासाठी सुबक तेरा पायऱ्या आहेत. याशिवाय महाद्वारापासून जवळच पाण्यापर्यंत जाणारा आणखी एक मार्ग आहे. उत्तरेकडून या पायऱ्या आहेत आणि पाण्यापाशी पोहचताना आपले तोंड पूर्वेला होते. केदारबाव आयताकृति कुंडाच्या आयताची आहे. निगडे देशमुखांचे केदारेश्वर हे कुलदैवत आहे.

फोटो संग्रह

Source:-

  • vicharmanthan shirwal-pride facebook page
  • InformationSubhanmangal Book
  • More help- Akshay Khairnar

Note: Following information totally refer from Subhanmangal Book all credit goes to book writer